पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून, ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आज (आठ जून) दुपारी एक वाजता mahresult.nic.in या संकेतस्थळासह अन्य काही संकेतस्थळांवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
दर वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, ८२.८२ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलांची संख्या ७२.१० टक्के इतकी आहे. विभागवार निकालात बारावीप्रमाणेच कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण विभागाचा निकाल ८८.३८ टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल ८२.४८ टक्के, तर सर्वांत कमी निकाल नागपूर विभागाचा (६७.२७ टक्के) आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा यशस्वी विद्यार्थ्यांची संख्या १२.३१ टक्क्यांनी कमी झाली आहे. राज्यातील तब्बल १७९४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
बदललेल्या अभ्यासक्रमानुसार झालेली ही पहिली परीक्षा होती. राज्यातील १७ लाख ८१३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख ४१ हजार ५६८ विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रमानुसार, तर ५९ हजार २४५ विद्यार्थ्यांनी जुन्या अभ्यासक्रमानुसार नोंदणी केली होती. तब्बल २२ हजार २४४ शाळांमधील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
सोमवारपासून (१० जून) विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी अर्ज करता येईल. याकरिता १९ जूनपर्यंत मुदत आहे.
विभागवार निकालाची टक्केवारी अशी :
औरंगाबाद : ७५.२० टक्के, मुंबई : ७७.०४, कोल्हापूर : ८६.५८, अमरावती : ७१.९८, लातूर : ७२.८७, नाशिक : ७७.५८ टक्के
निकाल पाहण्यासाठी :
mahresult.nic.in या वेबसाइटबरोबरच examresults.net, indiaresults.com, results.gov.in, www.maharashtraeducation.com, www.sscresult.mkcl.org या वेबसाइटवरही निकाल उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉल तिकीट/बैठक क्रमांकाच्या आधारे आपला निकाल शोधता येईल.
बीएसएनएल मोबाइल ग्राहकांना एसएमएसद्वारेही निकाल उपलब्ध होणार आहे. त्यासाठी MHSSC<Space>Seat No. या पद्धतीचा मेसेज 57766 या क्रमांकावर पाठवायचा आहे.